बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक शिक्षक  🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश पाटील      
 उपशिक्षक  : बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                              
➿➿➿➿➿➿➿➿➿


    जन्म : २२सप्टेंबर १८८७
         (कुंभोज, महाराष्ट्र)
     मृत्यू : ९ मे १९५९

टोपणनाव : कर्मवीर
पुर्ण नाव : भाऊराव पायगौडा 
                 पाटील
पेशा : समाजसुधारणा, 
                            शिक्षणप्रसार
प्रसिद्ध कामे : रयत शिक्षण संस्था
पुरस्कार : पद्मभूषण (१९५९)

              कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.

कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे. कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले .कोल्हापूर जिल्यात हातकनंगले नावाचा तालुका आहे .या तालुक्यात बाहुबली चा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्व्नाथाचे सुंदरभव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे या गावी २२सप्टेंबर 1887रोजी (आश्विन शुद्ध पंचमी ,ललिता पंचमी ) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात , खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.

🏢 शिक्षण संस्था
    पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.

दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -

शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.

मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.

निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे

अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.

संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.

सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.

बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले, व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.

त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. रयत शिक्षण संस्था हि आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक ,२७ प्राथमिक,४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय,२ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.

ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली. कर्मवीरांचे पूर्ण नाव भाऊसाहेब पायगौंडा पाटील. वडिलांचे नाव पायगौंडा तर आई चे नाव गंगाबाई होते. कर्मवीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील,दक्षिण कन्नड जिल्यातील मुडबीद्री गावचे. देसाई हे त्यांचे आडनाव. कर्मवीरांचे पूर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले.व एतवडे बुद्रुक. जि. सांगली येथे स्थिरावले.

📯  *रयतगीत-*

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||

कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||

गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||

दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||

जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - विठ्ठल वाघ

📚 पाटीलांची चरित्रे
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा. प्रभाकर नानकर)
कर्मवीर भाऊराव पाटील (बा.ग. पवार)
कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा.डॉ. रमेश जाधव)
कर्मवीर भाऊराव पाटील (संध्या शिरवाडकर)
कर्मवीर भाऊराव पाटील (सौ. सुधा पेठे)
कर्मवीर भाऊराव पाटील : काल आणि कर्तृत्व (डॉ. रा.अ. कडियाळ)
कुमारांचे कर्मवीर (द.ता भोसले) इंग्रजी अनुवाद Karmaveer Bhauraao Patil)
ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे (रा. ना. चव्हाण)
थोर रयतसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (लीला शांतिकुमार शाह)
समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (तृप्ती अंतरकर)
माणसातील देव, अजित पाटील

🎖 सन्मान
                सन १९५९ : पद्मभूषण
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
      
         🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

          ♾♾♾ ♾♾♾
         स्त्रोत ~ WikipediA                                                                     ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...