बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

भाऊबीज

 🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
          💠भाऊबीज💠

आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची प्रथा असते, दिवाळी पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज होय, कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो या यमद्वितिया असेही म्हणतात.

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलवले होते, यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, व यमराजाने आपली बहिण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले अशी पौराणिक कथा आहे. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्यावर्षी यमापासून भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो.

हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया, द्वितीयेचा चंद्र आकर्षक,वर्धमानता दाखवणारा आहे,तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन राहो हि त्यामागची भूमिका आहे.

बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनचा हा दिवस आहे, समाजातील सर्व भगिनींचा समाज व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्याचे स्वरक्षण करतील , त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील हा प्रण करून त्याप्रमाणे वागण्याचा हा दिवस आहे.

या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्रकोरीस नंतर भावाला ओवाळते ,भाऊ मग ओवाळणी म्हुणुन भेटवस्तू देऊन बहिणीचा सत्कार करतो. काही समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन चित्रगुप्ताची पूजा करतात.

जर काही कारणाने बहिणीला कोण ही भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्र ला भाऊ समजून ओवाळते, भावाबहीणीने एकमेकांची विचारपूस करावी एक मेकांवर प्रेम करावे या साठी सण साजरा करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
  श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

वसंतदादा पाटील


    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬
     संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
    ➿➿➿➿➿➿➿➿➿     
        
      वसंतराव दादा बंडूजी पाटील
          (सहकारातील योगदान)


         जन्म : १३ नोव्हेंबर १९१७
         (पद्माळे, सांगली, महाराष्ट्र)

           मृत्यू : १ मार्च १९८९
                       (मुंबई)

महाराष्ट्राचे ६ वे मुख्यमंत्री
           कार्यकाळ
१७ एप्रिल, इ.स. १९७७ – ८ जुलै, इ.स. १९७८
पुढील : शरद पवार
             कार्यकाळ
२ फेब्रुवारी, इ.स. १९८३ – १ जून, इ.स. १९८५
पुढील : शिवाजीराव निलंगेकर
   
राष्ट्रीयत्व : भारतीय
राजकीय पक्ष : अखिल भारतीय काँग्रेस
आई : रुक्मिणीबाई बंडूजी पाटील
वडील : बंडूजी पाटील
प्रथम पत्नी : मालतीबाई पाटील
द्वितीय पत्नी : शालिनीताई पाटील
नाते : प्रतीक पाटील (नातू)
अपत्ये : प्रकाशबापू पाटील
निवास : सांगली
धर्म : हिंदू
                  महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.

त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.

सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते.

महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. प्रवास, परगावी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकर्‍यांना कमी व्याज दराने कर्जपुरवठा इत्यादी महत्त्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणले. दादांच्या या लोकहितकारक निर्णयांची बीजे त्यांच्या देशभक्तीत व त्यांनी केलेल्या क्रांतिकार्यांत आढळतात.

वसंतदादा अगदी लहान वयातही (१९३०) स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. १९४० पासून त्यांनी लढ्यात जोमाने सहभाग घेतला. फोनच्या तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे, पिस्तुल-बाँबचा वापर करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणे इत्यादी कामांच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यात, १९४२ मध्ये आपला ब्रिटिश विरोध प्रखर केला. कायदेभंग चळवळीच्या काळात सोलापूरला चार युवक हुतात्मे झाले. या हौतात्म्याची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता. दादा काही काळ भूमिगत होते. त्यांना सुमारे ३ वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. १९४३ मध्ये दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्‍न केला असता, त्यांना खांद्याला गोळी लागली होती, व त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता. दादांच्या सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा-मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते. या प्रयत्‍नांत रामानंद भारती, बॅ. नाथ पै देखील सहभागी होते. सातारा-सांगली या भागांत दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य-सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन, त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम दादांनी केले होते.

वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. १९५६-५७ मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्या वेळी त्यांनी स्वत:शेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे.

सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. वसंतदादा १९५२ पासून लोकप्रतिनिधी होते, १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले, व नंतर मंत्री -मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. विशेष म्हणजे १९५२ ते १९७२ दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले. या पार्श्वभूमीवर दादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ १९५२ ते १९७२ असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे सत्तास्थानांवर नसताना त्यांनी सहकाराचा प्रचार-प्रसार-विकास केला हे लक्षणीय ठरते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, स्मरणशक्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, समाजमन-आकलन शक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाजजीवनाची अचूक, परिपूर्ण जाणीव - इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. १९१८ मध्ये प्लेगच्या साथीत दादांच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्या वेळी केवळ एक वर्षाचे असणार्‍या दादांचा सांभाळ, पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता. या परिस्थितीत दादा जास्त शिकू शकले नाहीत. पण पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या विकास-कार्याची फळे आज महाराष्ट्र चाखतो आहे. म्हणूनच दुर्दैवाने फार शिकू न शकलेला, पण तरीही सर्वांत शहाणा नेता या समर्पक शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.

🏭 वसंतदादा पाटील यांच्या नावाच्या संस्था

वसंतदादा पाटील साखर कारखाना
वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट (आधीचे नाव डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट), वाकडेवाडी (पुणे)
डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन, शुक्रवार पेठ (पुणे)
पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील कॉलेज ऒफ आर्किटेक्चर, पिरंगूट (पुणे)
वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, सायन (मुंबई)
वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, बुधगाव (सांगली)
वसंत दादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज, रहिमतपूर
वसंतदादा पाटील यांनी भूषविलेली पदे संपादन करा
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५)
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२)
साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते.
राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते कैक वर्षे अध्यक्ष होते
माहाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७).
१९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले.
१९७१ मध्ये अमेरिकेतील लुइझिॲना येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्‍ज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता.
 
       🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 विनम्र अभिवादन 🙏                                                                 
       स्त्रोत ~ WikipediA
➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

लक्ष्मीपूजन

    🪔लक्ष्मीपूजन(दीपावली)🏮


     🏵️महती लक्ष्मीपूजनाची🏵️

प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी.. या सणाचा आनंद लक्ष्मीपूजनाच्या म्हणजे दिवाळीच्या मूळ दिवशी द्विगुणित होतो. लक्ष्मीची यथासांग पूजा करुन, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून आश्व‌नि महिन्यातील अमावस्येस लक्ष्मीपूजन साजरे केले जाते.

पुराणातील एका कथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या द‌िवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक बाबी असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशिर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये श्रीसूक्तपठणही केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेरपूजन करण्याची रित होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु, गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविण्यात आला आहे. यावरून प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी, असे मानले जात. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.

लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.

    📚व्यापारीवर्गात उत्साह📚

व्यापारीवर्गातही लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होत असल्याने दुकानांची सजावट करुन लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन केले जाते.

     🧹केरसुणीचे महत्त्व🧹

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीला महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाबरोबरच स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असणारी नवी केरसुणी विकत घेऊन तिला लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. नाशिकमध्ये वर्षानुवर्ष दिवाळीतील इतर विक्रेत्यांप्रमाणेच केरसुणी विक्रेतेदेखील परराज्यांतून दाखल होऊन केरसुणींची विक्री करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
  श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

धनत्रयोदशी


  🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
       धनतेरस किंवा धनत्रयोदशी


 अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे…

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
       

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

दिवाळीचा पहिला दिवस - वसूबारस

   🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
           🐄 वसुबारस 🐄


        आज रमा एकादशी आहे आणि वसुबारस पण आहे.वसुबारस या सणापासूनच दीपावली पर्वाला प्रारंभ होतो,असे दांते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
        वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरी केली जाते. घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.
          वसुबारस दिवशी गायीची पाडसासह सायंकाळी पूजा करतात. सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.
       या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
     वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक गंमतशीर माहिती अशी सांगितली जाते की, दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढ होते. हे टाळण्यासाठी म्हणून १०० कोटी देव जिच्यात सामावले आहेत अशी ही आपली गौमाताचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभु प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी उपासना केली जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलक - श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...