शनिवार, ७ मे, २०२२

रविंद्रनाथ टागोर

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                                      ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
      ⚜️📰✍️🇮🇳👨🏻🇮🇳📰✍🏢
  
        गुरुदेव रवींद्रनाथ टागोर


            जन्म : ७ मे , १८६१
             (कोलकाता, भारत)

        मृत्यू : ७ ऑगस्ट , १९४१
               (कोलकाता, भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय 
कार्यक्षेत्र : साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, नाटक
भाषा : बंगाली
साहित्य प्रकार : कविता, नाटक
प्रसिद्ध साहित्यकृती : जन गण 
                       मन, गीतांजली
प्रभावित : द.रा.बेन्द्रे,पु.ल.देशपांडे
वडील : देवेंद्रनाथ टागोर
आई : सरला देवी
पत्नी : मृणालिनी देवी 
    (विवाहः ९ डिसेंबर, १८८३)

पुरस्कार :  साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१३)

ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते होते.
बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात यावा.

कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.

🧔 जीवनपट
प्रारंभिक आयुष्य (१८६१ - १९०१)
कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर (१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० - १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत. ११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारत भ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.

१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७ व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले. याच काळात त्यांनी संध्या-संगीत(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा "भिकारिणी" व सुप्रसिद्ध कविता "निर्झरेर स्वप्नभंग" आदी रचना लिहिल्या.

👫 पत्‍नी मृणालिनीदेवी व रवींद्रनाथ
बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. ९ नोव्हेंबर १८८३ रोजी त्यांनी मृणालिनी-देवी (जन्मनाव भावतारिणी १८७३ -१९००) यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यू) झाली.१८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्‍नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते. हा काळ रवींद्रनाथांचा "साधना काळ" म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले. आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.

🏤 शांतिनिकेतन (१९०१ - १९३२)

१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता . या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवीन्द्रनाथांच्या पत्‍नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान १९ जाने. १९०५ ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांन नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी, ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा free verse या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. १४ नोव्हे. १९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने "सर" ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.

१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे "श्री-निकेतन" असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले. १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.

🗃 अखेरची वर्षे  
              (१९३२-१९४१)
जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी "दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड" अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला. बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्‌र्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो. पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा (prose-prose) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय 'चित्रांगदा', श्यामा (१९३९), चंडालिका (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले. याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच (१९३४), आणि चार अध्याय (१९३४)आदी कादंबऱ्या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(naturalism) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे से (तो) (१९३७),तीन संगी (१९४०).
रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते. ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.

📯 रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र

रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.
       कारवार येथील सृष्टिसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्य ही त्यांनी रचले आहे. रवींद्रनाथांचा नेता व क्रांतिकारक या रूपांत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रवीन्द्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रविंद्रनाथ मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे हे बंगाली भाषा शिकले. मराठी व कानडी भाषेत लेखन केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा. बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रवीद्रनाथांचा प्रभाव आहे.

गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर रवींद्रनाथांनीच केले होते. याशिवाय तिचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले. मराठीतले पहिला गद्य अनुवाद हरि नारायण फडके यांनी केला होता. अमरावतीचे डॉक्टर राम म्हैसाळकर (जन्म : २९ मे, १९२९) यांनी रवींद्रनाथांच्या गीतंजली सकट एकूण चार पुस्तकांचा ‘रवींद्र गीतांजली...’ नावाचा गद्यानुवाद केला आहे. ह्या अनुवादला मसापचे उत्कृष्ट भावानुवादाचे स.ह. मोडक पारितोषिक मिळाले होते.
याव्यतिरिक्त सौ. ज्योती कुलकर्णी यांनी ‘गीतांजली रविंद्रनाथांच्या - माझ्या मराठीत’ नावाचे पद्यमय भाषांतर केले आहे. (२००८)

कार्य
पारंपारिक हैदा कोरीवकाम शैलीतील बंगाली लिपीतील रवींद्रनाथांची आद्याक्षरे "र-ठ" रवींद्रनाथ स्वतःची हस्तलिखिते अनेकदा अशा कलेने सजवत असत.
संगीत,साहित्य, तत्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते.

रवींद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. यमकप्रचुरता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते. रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात. सामान्य माणसांचे जीवन हे त्यांच्या कथांचे बीज आहे.

🎼 काव्य
१५-१६ व्या शतकातील वैष्णव रचनांचा रवींद्रनाथांवर प्रभाव होता. भारतीय परंपरेतील 'ऋषी' संकल्पनेचाही रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव दिसून येतो. गावोगावी गीत गात फिरणाऱ्या फकिरांसारख्या 'बाऊल' कलाकारांची ग्रामीण बंगालमध्ये परंपरा आहे. बाऊल स्वतःस कोणत्याही एका धर्माचे मानत नाहीत. त्यांच्या गीतांत हिंदू, मुस्लिम अशा दोन्ही धर्माची शिकवण दिसून येते. रवींद्रनाथांनी या परंपरेस बुद्धिजीवी वर्तुळात पूर्वी नसलेली प्रतिष्ठा दिली. त्यांच्या बाऊल परंपरेच्या अभ्यासाने त्यांच्या स्वतःच्या काव्यकृतीस नवा आयाम मिळाला. 'मनेर मानुष' (मनातील माणूस) आणि 'जीवन देवता' ही दोन रूपके टागोरांच्या कवितेत बऱ्याचदा दिसतात.

रवींद्रनाथांच्या गीतांजलीचे १९१३ सालची आवृत्ती..
गीतांजलीतील (গীতাঞ্জলি) चौथ्या कवितेचे (शीर्षकः प्रार्थना) मराठी भाषांतर 👇

विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर 
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा !

दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे 
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा 
एवढीच माझी इच्छा !

जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा !

माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे एवढीच माझी इच्छा !

माझे ओझे हलके करून 
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी 
एवढीच माझी इच्छा !

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील, तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा !

📚 कादंबऱ्या व इतर साहित्य
रवींद्रनाथांनी 'चतुरंग', 'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता), 'चार अध्याय', 'नौका डुबी', 'घरे बाईरे' या सारख्या ४ लघुकांदबऱ्या व ८ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. 'चतुरंग' ही सचिश नावाच्या परस्परविरोधी संकल्पनांत अडकलेल्या पात्राची कहाणी आहे. धार्मिक गूढतेतून आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या कथानायकाचा अंती होणारा भ्रमनिरास टागोरांनी या कादंबरीतून मांडला आहे.

गोरा कांदबरीतील मुख्य पात्र पारंपरिक हिंदू सनातनी मताचे समर्थक आहे. ह्या गौरवर्णीय पात्र व इतर पात्रातील संवादातून ही कांदबरी उलगडत जाते. सनातनी गोराच्या विचारामुळे त्याचे सनातनी वडील प्रभावित होत नाहीत. धर्मांधता ही श्रद्धेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या उग्र प्रकृतीने बनते असे टागोर या कादंबरीतून सांगतात.

'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता) ही कवितेने नटलेली कादंबरी. यात 'रवींद्रनाथ ठाकूर' हे स्वतःचेच नाव सांगणाऱ्या 'प्रसिद्ध कवी'वर टागोर त्रयस्थपणे टीका करतात. 'चार अध्याय' ही रवींद्रनाथांची शेवटची कांदंबरी. 'राष्ट्रभक्ती' म्हणजे काय?, राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय? अशा प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते.

📒 जीवनकहाणी
रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांव्या ’जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केला आहे.

🎻  रवींद्रसंगीत
रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास २२३० गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत असे संबोधले जाते. गगनेर खाले रबि चन्द्र दीपक ज्बले हे रवींद्रनाथांनी रचलेले पहिले व हे नूतन देखा दिक आरो बारो हे शेवटचे गीत मानण्यात येते. भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते असलेल्या जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना मूलतः रवींद्रसंगीताचा हिस्सा आहेत. सांगीतिकदृष्ट्या अभिजात भारतीय संगीत, बंगाली लोकसंगीत व अभिजात पाश्चात्त्य संगीत ह्या रवींद्रसंगीताच्या प्रेरणा मानल्या जातात. अभिजात भारतीय संगीतातील ठुमरी शैलीचा रवींद्रसंगीतावर मुख्य प्रभाव आहे. ही गीते रवींद्रनाथांच्या स्वतःचे तत्त्वचिंतन दाखवत असली तरी त्यांवर वैष्णव व उपनिषदीय तत्त्वज्ञानाचीही झलकही दिसते. रवींद्रसंगीतातील गीते ही विविध रागांमध्ये बांधण्यात आली असून रागाचा व गीताचा भाव यात सुसंगती असते. अनेक गीतांमध्ये विविध रागांना एकत्र बांधून नवसृजन केलेले दिसते. अभिजात भारतीय संगीतातून प्रेरणा घेतलेल्या रवींद्रसंगीत हे नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्रोत ठरले. रवींद्रसंगीताने प्रभावित गायक-वादकात विलायत खान (सतार), अमजद अली खान (सरोद) आदींचा समावेश आहे.

🎨 चित्रकला
वयाच्या ६० च्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. द. फ्रान्स मधील कलाकारांच्या प्रेरणेवरुन त्यांच्या चित्रांची पॅरिस मधील पहिल्या प्रदर्शनासह युरोपभर अनेक प्रदर्शने झाली. आयुष्याच्या या काळात रवींद्रनाथांना रंगांधळेपणाचा त्रास सुरू झाला होता. सौन्दर्यदृष्टी व रंगछटांमध्ये रवींद्रनाथांच्या चित्रशैलीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. रवींद्रनाथांनी रचनेत वेगवेगळ्या शैलींचे अनुसरण केले. यात उत्तर आयर्लॅडमधील मलनगान कारागिरीपासून कॅनडाच्या हैदा कोरीवकाम प्रकारापर्यंतच्या चित्र व शिल्पकलेतील शैली येतात. आपल्या कृतींची हस्तलिखितेही अनेकदा रवींद्रनाथांनी कलाकारीने सजवली आहेत.

🎭 नाट्य
वयाच्या विसाव्या रवींद्रनाथांनी 'वाल्मिकी प्रतिभा' नावाचे पहिले नृत्य-नाट्य लिहिले. यात भजनांच्या स्वरूपात असलेले पारंपरिक बंगाली कीर्तन व युरोपीय गीत-शैलींचा संमिश्र वापर केला आहे. ऐहिक सुखोपभोगांपासून पारमार्थिकाकडे हा विषय डाकघर नावाच्या नाटकात रवींद्रनाथांनी हाताळला आहे. 'अभिनयापेक्षा भावनांवर भर' असे रवींद्रनाथ स्वतःच्या नाटकांचे वर्णन करतात. 'चंडालिका', 'विसर्जन', चित्रांगदा', 'राजा', 'मायार खेला' ही रवींद्रनाथांची इतर नाटके. नाटकांसोबत टागोरांच्या 'नृत्य-नाटिका' विशेष प्रसिद्ध आहेत. मणिपुरी शैलीच्या अभिजात नृत्य शैलींचा टागोरांनी वापर केला आहे.

🛎 लघुकथा
'गल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पना व बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. 'काबुलीवाला' या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.

इस्रायलमधील सार पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनसंस्थेने रविंद्रनाथांच्या कथांचा हिब्रू भाषेतील अनुवाद 'एप' या नावाने इ.स. २००६ साली प्रकाशित केलेला आहे.

🎯 राजकीय मते
चरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालीन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही 'सामाजिक अनारोग्य' त्यांना मोठा शत्रू वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणाऱ्या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारीरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली 'एकला चलो रे' व 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

प्रभाव व वारसा
रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकूर बाडी गावी रवींद्रनाथांच्या पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो. रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तींत अमर्त्य सेन, अँन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी, पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे.

 निवडक साहित्य सूची

📚  कादंबऱ्या
गोरा (१९१०), घरे बाईरे (१९१६), चतुरंग (१९१६), चार अध्याय (१९३४) चोखेर बाली (१९०२), गोरा (१९१०), जोगाजोग (१९३०), मुक्तधारा (१९१६), राज ऋषि (१९१६), राजा आर रानी (१९१६), शेषेर कबिता (१९२९)

📝 लघुकथा
काबुलीवाला, दृष्टिदान, क्षुधित पाषाण

💃 नृत्य-नाटिका
चंडालिका (१९३८), चित्रांगदा (१९३६), मालिनी (१८९५), श्यामा (१९३८)

🎪 नाटके
बिसर्जना (१८९०), बैकुण्ठेर खाता (१८९७),  राजा ओ रानी (१८८९)

📖 काव्य व पुस्तके
गीतांजली (१९१०), जन्मदिने (१९४१), नैबेद्य (१९०१), पत्रपूत (१९३६), पूरबी (१९२५), पुनश्च (१९३२),शेष सप्तक (१९३५), श्यामली (१९३६), सोनार तारी (१८९३) 

🎞 चित्रपट
रवींद्रनाथांच्या अनेक कादंबऱ्या आणि लघुकथांवर बंगाली आणि हिंदी चित्रपट निघाले आहेत. उदा० परिणीता, काबुलीवाला वगैरे वगैरे. मराठीतही दृष्टिदान नामक लघुकथेवर त्याच नावाचा मराठी चित्रपट झाला आहे.

रवींद्रसंगीतातील काही निवडक गीते
आमार शोनार बांग्ला 
आमी चिनी चिनी गो तोमारे ओ गो बिदेशिनी | (मी तुला ओळखतो गं विदेशिनी --- रवींद्रसंगीतातील एक अतिशय लोकप्रिय गीत)
जन गण मन....

         🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷
                 
          ♾♾♾ ♾♾♾
          संदर्भ~ WikipediA                                                                                                                    ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

मंगळवार, ३ मे, २०२२

अक्षयतृतीया विशेष

✧═════•❁❀❁•═════✧*
⚜Ⓜ 🇹 🇸⚜ Ⓜ 🇹🇸⚜
             *✧═════•❁❀❁•═════✧*
       🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
          ⚜️आजची कथा⚜️
   
         अक्षय तृतीया विशेष


आज ०३/०४/२०२२ अक्षय तृतीया आहे.

"अक्षय "या शब्दाचा अर्थ काय?
वैशाख शु. तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात.

अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो.
 या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते.

 नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी_ _त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे.(काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे).

अक्षय तृतीया हे व्रत कसे करावे?

या दिवशी  व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ,परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा.

शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे.तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी )तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे.

त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे.हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते.या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे.म्हणून या तिथीला अक्षय तृतीया हे नाव पडले आहे.या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे.
उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात.स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो._ चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते.त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.

अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे?
हा धार्मिकांचा उत्सव (सण) आहे.या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते,यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात.या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते.या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात.तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना ,उद्‌घाटन वगैरेही केली जातात.नवीन वाहन खरेदी केले जाते.नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात.
थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.
अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे?
या तिथीस केलेले दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे._ _म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे.या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी
१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते.)
२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत._ _(मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते
३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.
४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.
५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.

_१) ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll_
_२) ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll_
_3) भृगुदेव कुलं भानुं, सहस्रबाहुर्मर्दनम्।_
_रेणुका नयनानंदं, परशुं वन्दे विप्रधनम्।।_
_ll ओम रां रां परशुरामाय सर्व सिद्धी प्रदाय नम: ll_

या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.

विशेष सूचना - कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते.असे म्हणतात

तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड,अक्षय सुख,समृद्धी नांदो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
         
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

रविवार, १ मे, २०२२

१ मे महाराष्ट्र दिन

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
      🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
➿➿➿➿➿➿➿➿➿           🏇🤺📔🇮🇳👨🏻🇮🇳📔️🏇 🤺                                      
       १ मे - महाराष्ट्र दिन  

                                                                                                      कणखर देशा, पवित्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…… दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा वाढदिवस  म्हणजे १ मे. ६० वर्षापूर्वी म्हणजेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती झाली . मागील ६० वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत . महाराष्ट राज्य आणि त्यासंबाधित अनेक पैलूचा आपण आढावा घेणार आहोतच पण त्याआधी आपणा  सर्वाना १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

१ मे म्हणजे हक्काची सुट्टी…। या दिवशी काय असते? असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर द्यायला अनेक जान सरसावतील आणि या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो असा सांगतील. पण, १ मे रोजी महारष्ट्र कामगार दिन का साजरा केला जातो? हे जाणून घेणे आवश्यक  आहे .

खर पहिला गेला तर १ मे  हा दिवस आंतरराष्ट्रीय  कामगार दिन! इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्या असं लक्ष्यात येत कि औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध  होऊ लागले . कामगारांकडे काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम कराव लागत असे . याविरोधात कामगार एकजूट झाले आणी त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद  उमटू लागले. अखेर कामगाराची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन अंतराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे १८११ पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे, संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला  गेला. या लढ्यात  कामगारांनी घेतलेली  अत्यंत महात्वाची होती. त्याच्या सहभागामुळेच हा लढा खर्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला, याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.

आता यानंतर आपण संयुक्त महाराष्ट्रचा लढा आणि  त्यानंतरचा महाराष्ट्र यावर नजर टाकूया…मराठी  भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी हि संकल्पना दस्तुरखुद्द लोकमान्य टिळक यांनी १९०६ साली मांडली होती. १९१९ साली कॉग्रेसंच्या जाहीरनाम्यात लोकमान्य टिळक याच्या अध्यातेखाली या संदर्भातील ठराव नमूद करण्यात आला होता. पण असं असलं तरी कालांतराने महाराष्ट्र् राज्याची वेगळी निर्मिती व्हावी याला कॉग्रेसंमधूनच विरोध होत गेला. कधी बॉम्बें  हे व्दिभाषिक राज्य व्हावं, तर कधी विदर्भ वेगळा राज्य व्हाव अशा नानाविध सूचना पुढे येऊ लागल्या. दरम्यान चलेजाव आंदोलनान जोर धरला होता तर दुसरीकडे दुसर  महायुद्ध जोरात सुरु होत, हि परिस्थीती लक्षात घेऊन संयुक्त  महाराष्ट्र चळवळीत सहभागी असलेल्या कार्यकत्यांनी  जरा सबुरीन घेत थोडीशी माघार घेतली होती. १३ एप्रिल १९४७ रोजी झालेल्या अकोला करार अंतर्गत असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र एकीकरण परिषद महा विदर्भा, मराठवाडा, बॉम्बे आणि उर्वरित महाराष्ट्र याच्या एकत्रीकरणासह संयुक्त  महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्यरत राहील.काही महिन्यातच भारत स्वतंत्र झाला. अखंड भारत देश हि संकल्पाना अस्तित्वात आली. संस्थाने खालसा करण्यात आली १९५३ साली तेलगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. १९५५ च्या दरम्यान डाव्या पक्षांनी बॉम्बे बंद चा इशारा दिला, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० मार्च १९५५ रोजी गिरगाव  इथं काढण्यात आलेला मोर्चा रोखण्याचे आदेश  मोरारजी देसाई यांनी दिले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चावर हुतात्मा चौक इथं  मोरारजी देसाई सरकारने अमानुष लाठीचार्ज केला. एवढ्यावर न थांबता मोर्चा वर गोळीबार कारण्यात  आला. यात शेकडो जन जखमी झाले तर १०५ जनाचे प्राण गेले.

या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचं  आंदोलन अधिक तीव्र झाला. ६ फेब्रुवारी  १९५६ रोजी केशवराव  जेधे यांच्या  अध्यक्षतेखाली  पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये   आचार्य अत्रे, प्रबोधनकर ठाकरे, सेनापती बापट,शाहीर अमर शेख अशा एका पेक्षा एक मातब्बर मंडळींचा   समावेश होता. यानंतरच्या काळात  आचार्य अत्रे यांनी मराठा मधून नेहरू आणि कॉंग्रेस सरकारच्या धोरणावर शब्दाच्या रुपात घणाघाती हल्ला करायला सुरुवात केली . शाहीर अमर शेखांसह अनेक शाहिरांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन पोहचवलं आणि डाव्या पक्षांच्या, कामगार संघटनांच्या साथीन एक मोठी चळवळ उभी राहिली. पण, सरकार मात्र मानायला तयार नव्हतं. नेहरू सरकारच्या दुटप्पीपणाच्या धोरणाला विरोध करत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. जनतेचं उत्स्फूर्त आंदोलन आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अखेर २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन, मुंबई (बॉम्बे) महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.                                            
🌐 1 मे - महाराष्ट्र दिन
                                                   1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.

महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.

देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.

महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वररांनी माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके। परी अमृतातेंहि पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥ अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे. मा.त्र्यं.पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांनी मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे. गं.रा.मोगरे यांनी माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित। किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित॥॥ म्हणून भाषेचा गौरव केला आहे. ना.के.बेहेरे यांनी भाषा आमुची छान। मराठी। भाषा आमुची छान॥ भाषा भिन्ना देशदेशच्या सर्वांची परि खाण॥ म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥ असा परखड प्रश्न विचारला आहे. ख्रिस्तदास स्टीफन यांनी जैसी हरळां (खडा) माजि रत्नकिळा। कि रत्ना माजि हिरानिळा। तैसी भासां माजि चोखाळ। भासा मराठी॥ या शब्दांत मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे. ना.गो.नांदापूरकर यांनी माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा गायिला आहे.

महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धारआपण करावयास हवा.                                                    
🏵️ २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

♨️ हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे

सिताराम बनाजी पवार
जोसेफ डेव्हिड पेजारकर
चिमणलाल डी. शेठ
भास्कर नारायण कामतेकर
रामचंद्र सेवाराम
शंकर खोटे
धर्माजी गंगाराम नागवेकर
रामचंद्र लक्ष्मण जाधव
के. जे. झेवियर
पी. एस. जॉन
शरद जी. वाणी
वेदीसिंग
रामचंद्र भाटीया
गंगाराम गुणाजी
गजानन ऊर्फ बंडू गोखले
निवृत्ती विठोबा मोरे
आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
बालप्पा मुतण्णा कामाठी
धोंडू लक्ष्मण पारडूले
भाऊ सखाराम कदम
यशवंत बाबाजी भगत
गोविंद बाबूराव जोगल
पांडूरंग धोंडू धाडवे
गोपाळ चिमाजी कोरडे
पांडूरंग बाबाजी जाधव
बाबू हरी दाते
अनुप माहावीर
विनायक पांचाळ
सिताराम गणपत म्हादे
सुभाष भिवा बोरकर
गणपत रामा तानकर
सिताराम गयादीन
गोरखनाथ रावजी जगताप
महमद अली
तुळशीराम पुंजाजी बेलसरे
देवाजी सखाराम पाटील
शामलाल जेठानंद
सदाशिव महादेव भोसले
भिकाजी पांडूरंग रंगाटे
वासुदेव सुर्याजी मांजरेकर
भिकाजी बाबू बांबरकर
सखाराम श्रीपत ढमाले
नरेंद्र नारायण प्रधान
शंकर गोपाल कुष्टे
दत्ताराम कृष्णा सावंत
बबन बापू भरगुडे
विष्णू सखाराम बने
सिताराम धोंडू राडये
तुकाराम धोंडू शिंदे
विठ्ठल गंगाराम मोरे
रामा लखन विंदा
एडवीन आमब्रोझ साळवी
बाबा महादू सावंत
वसंत द्वारकानाथ कन्याळकर
विठ्ठल दौलत साळुंखे
रामनाथ पांडूरंग अमृते
परशुराम अंबाजी देसाई
घनश्याम बाबू कोलार
धोंडू रामकृष्ण सुतार
मुनीमजी बलदेव पांडे
मारुती विठोबा म्हस्के
भाऊ कोंडीबा भास्कर
धोंडो राघो पुजारी
ह्रुदयसिंग दारजेसिंग
पांडू माहादू अवरीरकर
शंकर विठोबा राणे
विजयकुमार सदाशिव भडेकर
कृष्णाजी गणू शिंदे
रामचंद्र विठ्ठल चौगुले
धोंडू भागू जाधव
रघुनाथ सखाराम बीनगुडे
काशीनाथ गोविंद चिंदरकर
करपैया किरमल देवेंद्र
चुलाराम मुंबराज
बालमोहन
अनंता
गंगाराम विष्णू गुरव
रत्नु गोंदिवरे
सय्यद कासम
भिकाजी दाजी
अनंत गोलतकर
किसन वीरकर
सुखलाल रामलाल बंसकर
पांडूरंग विष्णू वाळके
फुलवरी मगरु
गुलाब कृष्णा खवळे
बाबूराव देवदास पाटील
लक्ष्मण नरहरी थोरात
ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
गणपत रामा भुते
मुनशी वझीऱअली
दौलतराम मथुरादास
विठ्ठल नारायण चव्हाण
देवजी शिवन राठोड
रावजीभाई डोसाभाई पटेल
होरमसजी करसेटजी
गिरधर हेमचंद लोहार
सत्तू खंडू वाईकर
गणपत श्रीधर जोशी
माधव राजाराम तुरे(बेलदार)
मारुती बेन्नाळकर
मधूकर बापू बांदेकर
लक्ष्मण गोविंद गावडे
महादेव बारीगडी
कमलाबाई मोहित
सीताराम दुलाजी घाडीगावकर
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
      ♾️♾♾♾ ♾♾♾♾️
      स्त्रोत ~  WikipediA

बुधवार, २३ मार्च, २०२२

२३ मार्च शहीद दिन

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
              ▬ ❚❂❚❂❚ ▬              संकलन - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                          
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   💥⛓🔫🇮🇳🙅‍♂🇮🇳🔫⛓💥

        23 मार्च शहीद दिन 


       शहिदे आझम भगतसिंग

     जन्म :  28 सप्टेंबर 1907
      (ल्यालपूर, पंजाब, भारत)
      फाशी : 23 मार्च 1931
(लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत)

टोपणनाव : भागनवाला
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: नौजवान भारत सभा,
            कीर्ती किसान पार्टी,
            हिंदुस्तान सोशालिस्ट     
            रिपब्लिकन असोसिएशन
पत्रकारिता/ लेखन: अकाली, 
              अनुवाद, 'मेरा आयरिश     
               स्वतंत्रता संग्राम'
धर्म: नास्तिक
प्रभाव: समाजवाद, कम्युनिस्ट
प्रभावित: चंद्रशेखर आझाद
वडील: सरदार किशनसिंग संधू
आई: विद्यावती

            भगतसिंग  एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि गीते मधला श्लोक उचलून हसत हसत फासावर चढले.
                  डिसेंबर १९२८ मध्ये, भगत सिंग आणि त्यांचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर, ब्रिटिश भारत येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे ते दोन आठवड्यांनंतर मरण पावले. 
                  त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिकाऱ्याला मारले.

भगतसिंग यांचे सुरुवातीचे जीवन-
            भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. त्यांचे काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्यांचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदु सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते. त्यांचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.
           त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखा तो लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेला नाही. त्याच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. 
                बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर त्यांचा अहींसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाला, व ब्रिटीश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचाराचा समर्थक झाला.
        ईटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या 'यंग ईटाली' नावाच्या गटापासुन प्रेरीत होऊन भगतसिंगने मार्च १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापित केली. तो हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लीकन संघाचा सदस्य झाला, ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिसमील, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने, व्यवस्था विवाह टाळण्यासाठी ते घर सोडुन कानपुरला निघुन गेले. एका पत्रात त्याने लिहीले 'माझ जिवन हे सर्वोत्क्रुष्ट कामासाठी मी समर्पीत केलय, जे की  देशाचे स्वतंत्र्य आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा भौतीक सुख मला आमि़ष करु शकत नाही'.

भगतसिंगांचे व्यासंग
                   भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबर्‍याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशनाआधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

वक्ते, पत्रकार, अनुवादक आणि नाट्याभिनेते-
        भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.

स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य-
            ९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.
                        भारत-पाकिस्तान सीमेवरील हुसेनवाला, जिल्हा फिरोजपूर,पंजाब नजीक उभारलेले भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांचे पुतळे
खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले  आरोपपत्र हॊय.

आरोपपत्र -
                    "वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकार्‍यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.
                 हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्‍न केला :-

१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.

२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बाँब व स्फोटके यांची निर्मिती करणे.

३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणार्‍या पोलिस वा इतर अधिकार्‍यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्र्‍या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणार्‍या लोकांचे वध करणे.

४) आगगाड्या उडविणे.

५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे.

६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे.

७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि,

८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणार्‍या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.

              सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला.

भगतसिंगांचे विचार -
                   बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
             समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.
                    समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.
           हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: 
'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'

          भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते. ते म्हणत "जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते है!"

शहीद भगतसिंग आणि गांधीजी -
                     भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. 
         महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
                कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."
                भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.

भगतसिंगांचे नास्तिकत्व-
             ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे शहीद भगतसिंग हे नास्तिक नसल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या संग्रहालयात आयोजित एका प्रदर्शनात करण्यात आला आहे. कम्युनिझमवर निष्ठा असणारे भगतसिंह आस्तिक असल्याचे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
                   भगतसिंग हे नास्तिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. लाहोरच्या तुरुंगात असताना भगतसिंग यांनी या गीतेचे अध्ययन केले होते. नास्तिक माणसाला जगातील कुठल्याही धार्मिक पु्स्तकाचा अभयास करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय भगवद्गीता हे धार्मिक पुस्तक नाही.
          संग्रहालयाचे क्युरेटर नरुल हुड्डा यांनी हा दावा केला असून, २७ सप्टेंबर २००८ ते ३१ मार्च २००९ पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित अनेक ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. यातच ८ एप्रिल १९२९मध्ये त्यांनी सेंट्रल असेंब्लीत फेकलेल्या बॉम्बच्या अवशेषांसह एक गीताही ठेवण्यात आली आहे.
       या गीतेवर भगतसिंग सेंट्रल तुरुंगात लाहोर असे लिहिण्यात आले आहे. परंतु भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी मात्र ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.
            शहीद भगतसिंगांचा "मी नास्तिक का झालो" हा निबंध प्रसिद्ध आहे. त्यामुळे भगतसिंग नास्तिकच होते यांत शंका नाही.
            या निबंधामुळे भगतसिंग  नास्तिक आहे कि नाही हा वाद बंद झाला. 

'मी नास्तिक कां झालो' - शहीद भगतसिंग (वय २३ वर्षे)
                "त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.
          'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? 
                एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.
           जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.

संग्रहालय -
                     अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलाँ येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे.

दफनभूमीवरील स्मारक -
                      भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता.भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.

पुस्तके-
          भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही निवडक पुस्तके :-

आम्ही कशासाठी लढत आहोत? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)
भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे (नॅशनल बुक ट्रस्ट)
मार्टियर ॲज ब्राइड-ग्रूम (इंग्रजी, ईश्वरदयाल गौर)
विदाउट फिअर, द ट्रायल ऑफ भगतसिंग (इंग्रजी, कुलदीप नय्यर) (मराठी अनुवाद - शहीद भगतसिंग यांचा अखेरपर्यंतचा प्रवास - भगवान दातार)
शहीद भगत सिंह : समग्र वाङ्मय (संपादक - दत्ता देसाई)
सरदार भगतसिंग (संजय नहार)
मी नास्तिक आहे का ? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)
  🇮🇳 इन्कलाब जिंदाबाद  🇮🇳
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

    🙏 विनम्र अभिवादन 🙏

    ♾♾♾♾♾♾♾♾♾♾
         संदर्भ ~ WikipediA                                                                                            
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
        🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
               ▬ ❚❂❚❂❚ ▬                                                      
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
    💥⛓🔫🇮🇳🙅‍♂🇮🇳🔫⛓💥

           शिवराम हरी राजगुरु

        जन्म : 24 आॕगष्ट 1908  
(खेड, पूणे, बाॕम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत)

        फाशी : 23 मार्च 1931
 (लाहोर, ब्रिटिश भारत - सध्या पंजाब, पाकिस्तान)

               वय : 22 वर्षे

              भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वापैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली आणि बलिदान स्विकारले. त्या क्रांतिकारकांची आठवण होताच तीन चेहरे आपसुकच डोळ्यांसमोर येतात. ते म्हणजे - भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव.  राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढयातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्ती या दोन गुणांचे त्यांना जणू वरदानच लाभले होते. 
             राजगुरू यांचा जन्म 24 ऑगष्ट 1908 ला पुणे जिल्हयातील, खेड येथे झाला होता. ते अवघे 6 वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे अल्प वयातच ज्ञानार्जन व संस्कृत शिकण्यासाठी काशी येथे गेले होते. तेथे त्यांनी हिंदु धर्मग्रंथांसोबतच वेदांचाही अभ्यास केला होता, परंतु 'लघु सिध्दान्त कौमुदी' सारखा क्लिष्ट ग्रंथसुध्दा अल्प वयातच मुखपाठ केलेला होता. त्यांना व्यायामाची आवड होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे प्रशसंक होते.
           वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी घर सोडले. घर सोडण्यामागे त्यांचे कारण देखील वेगळे होते. इंग्रजी विषयात नापास झाल्याने मोठ्या भावाने त्यांना आपल्या नववधूसमोर इंग्रजी धडा वाचायची शिक्षा सुनावली. अर्थातच राजगुरूंना ते काही जमले नाही आणि झाला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. शेवटी संधी साधून जसे होते तसे, आईने तेल आणायला दिलेले 9 पैसे आणि बहिणीने अंजीर आणायला दिलेले 2 पैसे असे एकूण 11 पैसे घेऊन त्यांनी घरातून धूम ठोकली ती कायमचीच.
             सर्वप्रथम त्यांनी नाशिकला काही काळ वास्तव्य केले आणि नंतर शिक्षणाच्या उद्देशाने ते काशीला पोहोचले. तेथे पुस्तकांत, राजकीय आणि व्यायामशाळेत लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या खेळात ते रमून गेले. काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हे सा-या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जायचे. तेथे अनेक गुप्त खलबतेही होत असत. याच काळात काशीमध्येच राजगुरूंची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. राजगुरूचे निडर व्यक्तीमत्व पाहून आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामिल करुन घेतले. त्या क्रांतिमय वातावरणात वावरतांना राजगुरूंमधील क्रांतिकारक घडत गेला. कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.
             याचवेळेस शिव शर्मा नावाच्या एका सहका-यासोबत दिल्लीमधील एका फितुराला ठार करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली. पण पिस्तुल एकच असल्याने पंचाईत होती.
कारण तो फितुर क्वचितच घराबाहेर पडत असे. त्यामुळे तेव्हा तो बाहेर पडेल तेव्हाच त्याला मारणे सोयीचे होते. त्यासाठी दोघाकडे पिस्तुल असणे आवश्यक होते. अन्यथा जोखीम पत्करावी लागली असती. राजगुरूंना थांबायला सांगून शिव शर्मा पिस्तुल आणण्यासाठी लाहोरला गेले. पण त्यांना पिस्तुल काही मिळाली नाही. जवळपास तीन दिवसांनी ते दिल्लीहून परतले आणि फितुराच्या घराजवळ पाहतात तो काय भलामोठा पोलीस पहारा आणि सर्चलाईट्स होत्या. शिव शर्मा काय समजायचे ते समजले. तो फितुर संध्याकाळच्या वेळेस 7 ते 8 च्या दरम्यान बाहेर पडत असे. त्याच संधीचा फायदा घेऊन राजगुरूंनी एकटयाने मोहिम फत्ते केली होती !  पाठी लागलेल्या पोलिसांचा ससेमिरा चुकवीत राजगुरू पळत मथुरेच्या दिशेने निघाले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी दिल्लीच्या पुढील दोन स्थानके  काळयाकुट्ट अंधारात रेल्वे पटरींतून पळत पार केली.
          सायमन कमिशनविरूध्द 30 ऑक्टोबर 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. "गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचे निधन झाले. 
            पंजाबकेसरी लाला लजपतराय यांच्यावर निर्दयीपणे लाठीहल्ला करून त्यांना ठार मारणा-या पोलीस अधिकारी स्कॉटला जगण्याचा अधिकार नाही अशी गर्जना करीत भगतसिंगांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला. राजगुरूंनी हट्ट केल्यामुळे भगतसिंगांनी त्यांना देखील आपल्या बरोबर सामील करून घेतले. त्यांचा अजून एक साथीदार जय गोपाळ पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालींवर पाळत ठेवून होता. पण 4 - 5 दिवस स्कॉट त्या भागात आलाच नाही. 
            अखेर दुस-या दिवशी एक गोरा अधिकारी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. जय गोपाळला वाटले की हाच स्कॉट आहे, म्हणून दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरुंना खूण केली. पण भगतसिंगांनी हा स्कॉट नसावा अशी प्रतिक्रिया दिली. परंतु राजगुरूचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरुंनी त्या गो-या अधिका-यावर गोळी झाडली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग आठ गोळ्या झाडत त्या गो-या अधिका-याला यमसदनी धाडले. त्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यात मात्र ते यशस्वी झाले . नंतर दोघांनाही कळले की तो स्कॉट नसून साँडर्स होता. 
            माणूस चुकला पण मोहीम अयशस्वी राहिली नाही यातच भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनीही समाधान मानले. इकडे मारेक-यांच्या मागावर पोलीस हात धुवून लागले होते. पण शेवटी वेषांतर करून भगतसिंग आणि राजगुरू दोघेही दिवसाढवळया एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्यात मिसळू लागले. परंतु फार काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाहीत, आणि 1929 सालच्या सप्टेंबर महिन्यात ते पोलिसांच्या हाती लागले.

            त्यांनी साथीदारांची नावे सांगावीत म्हणून कारागृहात त्यांचा अमानवी छळ करण्यात आला. शेवटी छळ करणारे थकले पण राजगुरुंनी त्यांना आपल्या साथीदारांच्या नावाची साधी पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते.
             पुढे कारावासात शिक्षा भोगत असतांना भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या सहाकाच्या सोबत त्यांची पुन्हा भेट झाली. तेथेही त्यांनी आपला क्रांतिकारी बाणा ढळू दिला नाही. अखेर लाहोर खटल्याचा निकाल आला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये 23 मार्च 1931 ला संध्याकाळी 7.33 ला फासावर चढवण्यात आले आणि तीन पेटत्या  निखान्यांची धग विझली. त्यांच्या बलिदानाचा 23 मार्च हा दिवस आपल्याकडे शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
             स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणाची आहुती देणा-या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपर्वात अढळ करणा-या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा !!
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🙏🌷

   ♾♾♾♾♾♾♾♾♾♾
     स्त्रोत ~ inमarathi.com                                                               ➿➿➿➿➿➿➿➿➿
   💥⛓🔫🇮🇳🙅‍♂🇮🇳🔫⛓💥
  शहीद सुखदेव रामलाल थापर
        (भारतीय क्रांतिकारक)

        जन्म : १५ मे १९०७
     नौघरा, लुधियाणा (पंजाब)
       फासी : २३ मार्च १९३१             आई : श्रीमती राल्ली देवी 
वडील : श्री. रामलाल थापर 
संघटना : नौजवान भारत सभा 
     
     भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात. आईचे नाव शल्ली देवी असे होते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली.
                    सुखदेवांनी ल्यालपूर (पंजाब) येथे १९२६ पासून तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ‘च्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. तीत ‘ हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र,भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले :

(१) स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे.
(२) तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे.
(३) जातियतेविरुद्घ लढणे
(४) अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे.

या कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.
                 नोव्हेंबर १९२८ मध्ये लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन लाहोरला आले असता निदर्शनाचे नेतृत्व केले होते. निदर्शनाच्या वेळी झालेल्या लाठीमारामध्ये ते घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड म्हणून ब्रिटिश अधिकारी साँडर्स याचा गोळ्या झाडून वध करण्यात आला. या कटामध्ये सुखदेव यांचाही सहभाग असल्याने भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. पक्षपाती, वसाहतवादी दृष्टीने ग्रासलेल्या न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सुखदेव आणि त्यांचे साथीदार भगतसिंग, राजगुरु यांना खटल्यातून सोडविण्याचे प्रयत्न म. गांधीजींनी केले; मात्र त्यांना त्यात यश आले नाही. लाहोरच्या तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले. ब्रिटिश सरकारच्या या अन्यायी, पक्षपाती वृत्तीमुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. फासावर चढविण्याअगोदर काही वेळापूर्वी सुखदेव यांनी म. गांधीजींना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्यांनी क्रांतीकारकांबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन प्रमुख विचारधारांवर प्रकाश टाकला आहे. सुखदेव यांना हंसराज व्होरा यांच्या प्रयत्नांमुळे लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची संधी आली; मात्र त्यांनी ती बाणेदारपणे अव्हेरली. या आणि अशा अनेक प्रसंगांतून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो.

क्रांतिकारक सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लुधियाना येथील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
♦️ शहीद सुखदेव यांच्या जीवनचरीत्रावर काही सुविचार
“जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले”
“त्याग करून आपल्या सुखांचा, फासावर गेले त्रिदेव, शत-शत नमन तुम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव”
“मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व आपले विसरून गेले, नतमस्तक मी तयांच्या चरणी, जे देशासाठी शहीद झाले”        
      
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🙏🌷

      ♾♾♾♾ ♾♾♾♾
          स्त्रोत ~ Vikaspedia                                                                ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

मंगळवार, १५ मार्च, २०२२

शहाजीराजे भोसले

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह  🖥️
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
               ▬ ❚❂❚❂❚
संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते 
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
   🚩🏇🤺🇮🇳🤴🏻🇮🇳🏇🤺🚩
         
         शहाजीराजे भोसले


      जन्म : १५ मार्च १५९४

    मृत्यू : २३ जानेवारी १६६४
        होदिगेरे (चन्नागरी जवळ)

राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत.

पूर्ण नाव : शहाजीराजे      
               मालोजीराजे भोसले
पदव्या : सरलष्कर
      
उत्तराधिकारी : व्यंकोजी भोसले 
                          तंजावुर
                   छत्रपती शिवाजीराजे 
                    भोसले, पुणे

वडील : मालोजीराजे भोसले
आई : उमाबाई
पत्नी : जिजाबाई, तुकाबाई
संतती : संभाजीराजे भोसले (थोरले), छत्रपती शिवाजीराजे भोसले, व्यंकोजी भोसले, कोयाजी, सन्ताजी
राजघराणे :भोसले
चलन : होन

हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.

🤱 जन्म
              मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई) हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भोसले यांची मुख्य राणी उमव्वा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत.

🌀 पार्श्वभूमी
        राजस्थानच्या चित्तोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला (अहमदनगर जवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी) नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

🔸 अहमदनगरच्या निजामशाहीत
                   मालोजीराजे भोसले आपला भाऊ विठोजीराजे भोसले इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहाजींचे पिता मालोजीराजे यांनी लखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स. १५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली.

🏇 भातवडीचे युद्ध
                मुघल शहेनशाहने इ.स.१६२४ लष्कर खानला १.२ लाखाचे सैन्यासह निजामशाही संम्पवण्यासाठी दक्षिणेस पाठविले, त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, १० हजार त्यांनी स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वहाणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले, अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गावं अहमदनगर पासून १५ किमी अंतरावर आहें.

🔮 निजामशाहीची अखेर   निजामशाही वजीर, जहान खानने, निजामाला मारले, आणि शहाजीराजाना निजामशाहीसाठी मिळवले. शहाजहानने दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषांना ठार करवले. उद्देश असा की निजामशहीला वारस रहाणार नाही. तेव्हा शहाजीराजानी, निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादीवर बसवून स्वत: कारभार हाती घेतला, व जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. त्यानी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.

दिल्लीचा बादशहा शहाजहानने ४८,००० सैन्य निजामशाही, आदिलशाही संपवण्यासाठी पाठवले तेव्हा घाबरून आदिलशहा, शहाजहानला मिळाला. शहाजी व निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तरीही शहाजीने नेटाने लढा चालू ठेवला. दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहील आणि शहाजी आदिलशाहीला मिळेल. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता तोही त्यांच्याकडेच ठेवला.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. शहाजीराजे मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यांनी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्याना मांडलिक केले. त्यामुळे गरज पडली तेव्हा हे राजे शहाजींच्या मदतीला आले.

🚩 हिंदवी स्वराज्य
                   शहाजी महाराजांनी आपले पुत्र शिवाजीला पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. शिवाजीबरोबर दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख हेही पुण्यात आले. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.

शिवाजींच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस आहे या संशयाने आदिलशाहीने, मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा, अफझलखानाच्या दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७,००० फौज विजापूर बाहेर खडी ठेवली होती.

शहाजीराजांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,

इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ - आदिलशाही
इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ - निजामशाही
इ.स. १६३० ते इ.स. १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ - निजामशाही
इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ - आदिलशाही
पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी (जिल्हा दावणगिरी- कर्नाटक) येथे बांधली.

💎 वारसा
                   शहाजीराजे आपल्या कारकिर्दित निझाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले तरी त्यांची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यांनी तसा दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. त्यांचे स्वप्न त्यांचे पुत्र शिवाजी (महाराष्ट्र) एकोजी (तन्जावर) यानी प्रत्यक्षात आणले.

     🚩 हर हर महादेव...! 🚩

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
        ♾♾♾ ♾♾♾
        स्त्रोत ~ WikipediA                                          
➖➖➖➖➖➖➖➖➖    
🇲 🇹 🇸   🇲 🇹 🇸  🇲 🇹 🇸
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, १२ मार्च, २०२२

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी.डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                               
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
    ⚜️🏤🏭🇮🇳👨🏻🇮🇳🏭🏤⚜️

          यशवंतराव चव्हाण


      (महाराष्ट्राचे १ले मुख्यमंत्री)

      जन्म: १२ मार्च १९१३
            (देवराष्ट्रे जि. सातारा 
              महाराष्ट्र, भारत)
     मृत्यू : २५ नोव्हेंबर  १९८४
                    (दिल्ली)

               कार्यकाळ
मे १, इ.स. १९६० – नोव्हेंबर १९, इ.स. १९६२

                राज्यपाल
श्रीप्रकाश (१९५६–१९६२)
पी. सुब्बरायण (१९६२)
पुढील : मारोतराव कन्नमवार
राष्ट्रीयत्व : भारतीय
राजकीय पक्ष : अखिल भारतीय 
                       काँग्रेस
अपत्ये : नाही
निवास : कराड
शिक्षण : टिळक हायस्कूूल,कराड.
व्यवसाय : राजनीतिज्ञ
धर्म : हिंदू
                 यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.

💁‍♂ जीवन

इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .

💵 यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात

योजना

- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)

- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)

- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)

- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

- नागपूर येथे दीक्षा भूमीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तसेच त्यांच्या आदरापोटी डॉ. आंबेडकर जयंतीची सुट्टी (१४ एप्रिल) देण्याची प्रथा यशवंतरावांनी महाराष्ट्रात सुरू केली. 
    ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.

📚 यशवंतराव चव्हाणांचे चरित्र किंवा व्यक्तिचित्रण वर्णन करणारी पुस्तके

आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)
आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
Chavan,The Man of Crisis (B.B.Kale)
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
Man of Crisis (Baburao Kale)
मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के. पवार)
यशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)
यशवंतराव : एक इतिहास (रामभाऊ जोशी)
यशवंतराव चव्हाण (प्रा. डॉ. कायंदे पाटील)
Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
यशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)
यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (हिंदी, परमार रंजन)
यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
यशवंत स्मृतिसुगंध (रामभाऊ जोशी)
यशस्वी यशवंतराव (रा.द. गुरव)
वादळ माथा (राम प्रधान)
YB Chavan: A PoliTical Biography (D.B. Karnik)
सह्याद्रीचा सुपुत्र (डॉ. न.म. जोशी) (मराठी, इंग्रजी, हिंदी, सिंधी, गुजराती भाषेत.)
सोनेरी पाने (भा.वि. गोगटे)
ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)

📝 यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा

आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
ॠणानुबंध (ललित लेख) (१९७५)
कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४) हे पुस्तक बोलके पुस्तक या स्वरूपातही आहे.
भूमिका (१९७९)
महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
विदेश दर्शन
सह्याद्रीचे वारे (१९६२) ‌- भाषण संग्रह
युगांतर (१९७०) स्‍वातंत्र्यपूर्व व स्‍वातंत्र्योत्‍तर हिंदुस्‍थानच्‍या प्रश्‍नांची चर्चा

📕 यशवंतराव चव्हाणांचे भाषण संग्रह/पुस्तिका

असे होते कर्मवीर (भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख - १९६८)
India's foreign Policy - १९७८
उद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)
काँग्रेसच्या मागेच उभे राहा - औरंगाबाद येथील भाषण - पुस्तिका
कोकण विकासाची दिशा (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन - पुस्तिका -१९६०)
ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये ’प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र’ या विषयावरील व्याख्यान, (पुस्तिका - १९६१)
जीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका - १९७३)
पत्र - संवाद (संपादक: स.मा.गर्गे - २००२)
पक्षावर अभंग निष्ठा (राजकारणातील माझी भूमिका- पुस्तिका )
महाराष्ट्र- म्हैसूर सीमा प्रश्न (पुस्तिका - १९६०)
महाराष्ट्राची धोरण सूची - (पुस्तिका - १९६०)
यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे - सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ - १९७१
The Making of India's Foreign Policy - १९८०
युगांतर (निवडक भाषणांचा संग्रह - १९७०)
लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका- १९५७)
वचनपूर्तीचे राजकारण - अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका - १९६९))
विचारधारा - (भाषण संग्रह - १९६०)
Winds of Change - १९७३
विदर्भाचा विकास (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) - (भाषण पुस्तिका - १९६०)
विदेश-दर्शन (परदेशांतून पत्नीला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह, संपादक - रामभाऊ जोशी, २०१७)
शब्दाचे सामर्थ्य ( भाषणे - २०००; संपादक: राम प्रधान)
शिवनेरीच्या नौबती (भाषण संग्रह) - तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१
सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह - १९६२)
हवाएँ सह्याद्रि की (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)

📽 चित्रपट

यशवंतराव चव्हाण - बखर एका वादळाची. (मार्च २०१४) (दिग्दर्शक जब्बार पटेल)

🏢 यशवंतराव चव्हाण नावाच्या संस्था

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्‍नाथ भोसले रोड, मुंबई
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे
यशवंतराव चव्हाणांचे पुतळे - कऱ्हाड, पिंपरी(पुणे), फलटण, सातारा, लातूर (महापालिका प्रवेशद्वार), संसद भवनाच्या लॉबीत(नवी दिल्ली)
   
        🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
         ♾♾♾♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                                                                                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...