शुक्रवार, २८ जुलै, २०२३

वर्ग प्रतिनिधी निवडणूक २०२३\२४

लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी घेतली ई - निवडणूक : 

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वर्गप्रतिनिधी निवडीसाठी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम :

शालेय विकासासाठी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी संपन्न :
धुळे दि. २८|७|२३



विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता विविध प्रात्यक्षिकांसह शिकविणे ही काळाची गरजच बनलेली आहे. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकवलेले चिरकाल स्मरणात राहते यासाठी आपली लोकशाही व त्यातील निवडणूक प्रक्रिया याची माहीती व्हावी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच विद्यार्थी प्रतिनिधींसाठी लोकशाही पद्धतीने ई - निवडणूक, अनोखी व नाविन्यपूर्ण मतदान प्रक्रिया संपन्न झाली.
या मतदानाचे विशेष म्हणजे ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला. 'वोटींग मशीन' या मोबाईल ॲपच्या सहाय्याने उमेदवार व त्यांचे चिन्ह यासमोरील बटन दाबून विद्यार्थ्यांनी मतदान केले. 
इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गांसाठी वर्ग प्रतिनिधी म्हणून एकूण 24 उमेदवार रिंगणात उतरलेले होते. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य श्री प्रवीण पाटील सर यांच्याकडे सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उमेदवार म्हणून उमेदवारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सभा आयोजित करून त्यांना या मतदानासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्ग हा मतदार संघ असून त्या वर्गातील वर्ग प्रतिनिधींसाठी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक साहित्याचे चिन्ह वाटप करण्यात आले. आणि प्रचारासाठी सुद्धा त्यांना दोन दिवस देण्यात आले. त्यानंतर  इयत्ता पाचवी ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहीती उपक्रम संयोजक श्री अविनाश पाटील यांनी दिली.

मतदानानंतर कु. किर्ती गवळी (इ. ५ वी), कु. खुशी कोळी (इ. ६ वी), कु. उमेश्वरी पारधी (इ. ७ वी). कु. श्रद्धा चव्हाण (इ. ८ वी), सुमित हिवरकर (इ. ९ वी), भाविका मोहीते (इ. १०), चेतन पाटील (इ. ११ वी) व प्रसाद पाटील (इ. १२ वी) यांनी बहुमत मिळवले. निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी नाचून जल्लोष साजरा केला. यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यापैकी त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडामंत्री, सहल मंत्री, अर्थ मंत्री, स्वच्छता मंत्री अशी विविध मंत्री पदे देऊन लगेच शपथविधीचा कार्यक्रम ही संपन्न झाला. यातून शालेय कामकाजामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार असून प्रशासकीय कामाची माहीती देखील मिळणार असून त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसीत होईल असा आत्मविश्वास प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते  मनोगतात म्हणाले की, "अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेतला तर नक्कीच त्यांना आपल्या लोकशाही प्रणालीतील बऱ्याचशा गोष्टीं स्पष्ट होतील. शालेय जीवनात समजून घेतलेल्या गोष्टींचा चिरकाल परिणाम होत असतो. म्हणूनच आम्ही आमच्या संस्थेमध्ये अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी संधी देत असतो. आज पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिक देण्याची गरज आहे. त्यांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देणे महत्वाचे आहे."

उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री जयेश गाळणकर, श्री कुणाल साळूंके, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांचे सहकार्य लाभले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव मा. स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी अभिनंदन व कौतूक केले.

बहिर्जी नाईक

    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬                संकलन : श्री अविनाश पाटील          बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                    
     स्वराज्याचा तिसरा डोळा
            बहिर्जी नाईक

 
       
             मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगत असलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.
           दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले.
          बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते.
       शिवाजीच्‍या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणार्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्‍यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचे. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असे म्हटले जाते की, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची.
         बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. शत्रूचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहिती ते ठेवत.
         शिवाजी राजे व संभाजी जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यांत लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले.
       शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाचा बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इथंभूत माहिती महाराजांना दिली होती. बर्‍याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करून पाऊल टाकत. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
         सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्डन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अश्या रीतीने बहिर्जी नाइकांबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत.
          महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धान्त मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान-मंत्रिपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धान्त कौटिल्य मांडतो.
        युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्या द्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेर व्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्‍न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.
      बहिर्जी नाईक यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. शिवाजीराजांनी अठरापगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. *बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.* आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणार्‍यास शिवरायांनी इनाम जाहीर केले, तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित.
       स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजलखानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजलखानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजलखान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदल, हत्ती, तोफा-दारूगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली.
        इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजांस जीवे मारण्याचा आहे असा नि:संदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
        पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू आणि शिवा काशीदकडे जाते तसेच ते बहिर्जी यांच्याकडे देखील जाते. शाहिस्तेखान प्रसंगातदेखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदा. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे (हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐन वेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती). तसेच रमझानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादी तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करायची योजना आखली आणि 
ती यशस्वी केली. (राजे सहिष्णू वृत्तीचे होते पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी ‘रमझान महिना’ संपण्याची वाट पाहिली नाही).
          शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे २०००० सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता.
       तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मोगलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले.
          बहिर्जी नाईक भिकार्‍याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच, संपत्तीच्या ठावठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार ) जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटीदरम्यान दानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ तीन दिवसांत सुरत मोहीम यशस्वी केली त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे.
      आग्र्‍याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या इंटेलिजन्सची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता.
        शिवाजीस नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याचा औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्या शिवाय ती यशस्वी होणे शक्य नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरू केला त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद-बुंदेलखंड-खानदेश-गोंडवन-गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोहोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्ष प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभवती असणार आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित.
         शिवरायांचे संपूर्ण जीवन धकाधकीने आणि रोमहर्षक प्रसंगांनी भरलेले आहे. जेथे फक्त पराजय शक्य आहे अशा प्रसंगात शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांनी बहुतांश लढाया युक्तीने लढलेल्या असून लढाईपूर्वी शत्रूची संपूर्ण माहिती मिळवण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपली व्यूहरचना केली.
        बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखात देखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इत्यंभूत माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज, हेजीब असे उल्लेख अस्सल कागदपत्रात आढळतात. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्ल्यांवर माहितीची देवाण-घेवाण करणे आणि त्यांत समन्वय साधणे हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही आणि असे म्हटल्याने कोणावर अन्यायही होणार नाही. शिवाजी महाराजांनी देखील त्यांचे महत्त्व ओळखून हेरखाते प्रबळ करण्यावर भर दिला. अष्टप्रधान मंडळात हेरखात्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नव्हते तरी बहिर्जी यांना सरदारकीचा दर्जा दिला आणि हेरखात्यास साधनसामग्री आणि द्रव्याची चिंता भासू दिली नाही. बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण ३००० हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेरखाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंद फितुरीने भरलेला असूनदेखील शिवाजी महाराजांना मात्र संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगा फटका झालेला आढळून येत नाही.
      इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाची’ एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेर यंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता? औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते. इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते ‘बहिर्जी नाईक’.
         गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसते. कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. सेनानी लढाईत लढतात पण गुप्तचरांना शांततेच्या काळात
देखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते हे मान्य करावे लागेल.
         बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आताच्या हेरव्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. ‘रॉ’बरोबर त्याची तुलना करणे हास्यास्पद ठरेल. ‘आयएसआय’, ‘सीआयए’शी त्याची तुलना करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल पण ती उलटय़ा बाजूने करावी लागेल म्हणजे- मोसाद म्हणजे इस्राइलचे बहिर्जी असे म्हटल्यास ते जास्त चपखल ठरेल.
        जेम्स बाँड असो किंवा शेरलॉक होम्स, ही दोन्ही पात्रे कल्पनेतील आहेत, परंतु साहित्य आणि दृक्श्राव्य माध्यमांच्या ताकदीमुळे ही दोन्ही पात्रे वास्तवातील वाटतात. ब्रिटिशांनी तर बेकर स्ट्रीटवर शेरलॉक होम्सचे घर वसवले आहे आणि लोक ते पाहण्यास जातात.
        जेम्स बाँड किंवा शेरलॉक होम्सने पुस्तकात, सिनेमात जी कामिगरी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, शिवरायांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून वावरलेले हे व्यक्तिमत्त्व आपल्या साहित्यात आणि दृक्श्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘बहिर्जी नाईक’ हा १९४३ सालचा सिनेमा, २-४ छोटेखानी पुस्तके, भूपाळगड (ता. तासगाव, जि. सांगली) येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिन्ही धरणाला दिलेले ‘बहिर्जी नाईक सागर’ हे नाव हीच काय ती आपण या ‘सर्वोत्कृष्ट’ हेरास वाहिलेली आदरांजली.. !
          बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. ‘भूपाळगडावर हेरगिरी करताना त्याचा मृत्यू झाला’, ‘लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले’ अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात.
        बहिर्जी यांच्या कारकिर्दीत त्याला एकदाच ओळखले ते जॉर्ज ओग्झेन्डन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणार्‍या हेन्‍री ओग्झेन्डनचा हा भाऊ). सुरतची लूट चालू असताना वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा. महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारीसमोर भीक मागणार्‍या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले पण तोपर्यंत उशीर झाला होता, पण त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले.
          २१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिला म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तर ना इतिहासकारांपाशी आहे ना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!!!!
        बाणूरगड महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे. येथून पुढे सोलापूर जिल्हा सुरु होतो. मराठी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी येथे आहे.
              ⛰🚩🌋
    🚩 हर हर महादेव 🚩
🙏 स्वराज्य निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात - अज्ञात नरवीर मावळ्यांना विनम्र अभिवादन* 🙏

          ♾♾♾  ♾♾♾
         स्त्रोत ~ Wiipedia                                                                                                                                                                                           ➖➖➖➖➖➖➖➖➖                              

बुधवार, २६ जुलै, २०२३

पालक शिक्षक संघ सभा

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा संपन्न.
आपल्या पाल्याला ध्येय दाखवा व त्याच्या ध्येय पूर्तीसाठी प्रोत्साहन द्या : नानासाहेब महेंद्र विसपूते 
धुळे दि. २६ 

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज पालक शिक्षक संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य श्री पी. बी. पाटील, पालक प्रतिनिधी श्री सुनिल पुंडलिक सोनवणे, श्री छोटू मोहीते उपस्थित होते. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले. स्वागत श्री ए. के. पाटील, प्रास्ताविक श्री पी. बी. पाटील यांनी तर आभार श्री डी. डी. पवार यांनी मानले. यावेळी उपस्थित पालकांमधून कार्यकारी समितीतील सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष म्हणून श्री सुनिल सोनवणे यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून श्री ए. के. पाटील यांची तर  सहसचिव म्हणून श्री डी. डी. पवार व  श्रीमती सरला गवळी यांची निवड करण्यात आली. पालक सदस्य म्हणून श्री छोटू मोहीते, श्रीमती संगीता पारधी, श्री दिलीप बच्छाव, श्री शंकर मोरे व सुक्राम मोरे यांची निवड करण्यात आली.
उपस्थित पालकांमधून श्री छोटू मोहीते व श्री सुनिल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतूक केले. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतातून 
पालकांना मार्गदर्शन करतांना नानासाहेब महेंद्रजी विसपूते यांनी सांगीतले की, आपल्या पाल्याला ध्येय ठरविण्यासाठी व ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियमीत प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा द्या. एक दिवस नक्कीच ते आईवडील व गुरूजणांचे नाव लौकिक करतील. संस्थाचालक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सर्व सुविधा पुरवीत असतो. शिक्षक त्यांचे अध्यापनाचे काम प्रामाणिक पणे करीत असतात. त्यासोबत पालक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहीजे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री कुणाल साळूंखे, श्री जयेश गाळणकर, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार, श्री विलास भामरे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते व सचिव मा. स्मिताताई विसपूते यांनी कार्यक्रम यशस्वी आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

रविवार, २३ जुलै, २०२३

चंद्रशेखर आझाद

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 

संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
            

               क्रांतिकारक 
           चंद्रशेखर आझाद


      जन्म : २३ जुलै, १९०६
(भाबरा, झाबुआ, अलिराजपूर, मध्यप्रदेश)
     विरमरण : २७फेब्रुवारी,  
                     १९३१
      (अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद)
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: कीर्ति किसान पार्टी,  
            नवजवान किसान सभा
धर्म: हिंदू
वडील: पंडित सिताराम तिवारी
आई: जगरानी देवी

          चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पुर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले.
            वाराणसीला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला, व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्रीप्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतिची दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजल्या, त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.
       साँडर्सचा बळी घेतल्यावर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेष पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंताचा चेला बनले होते. कारण की, या महंताजवळ पुष्कळ द्रव्य होते. ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते, परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून दिला. पुढे ते झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तूलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले.
         काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. वर वर पाहणार्‍याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले आहे असे वाटे.
         गांधी आयर्वीन करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठविला की, आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी, असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल, परंतू गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले.”मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’,ही आझादांची प्रतिज्ञा होती. २७ फेब्रुवारी १९३१ ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले,” अरे शिपाई भाईंओ, तुम लोग मेरे ऊपर गोलियाँ क्यों बरस रहे हो ? मै तो तुम्हारी आजादी के लिये लढ रहा हूँ ! कुछ समझो तो सही !” इतर लोकांना ते म्हणाले,” इधर मत आओ ! गोलियाँ चल रही है ! मारे जाओगे ! वंदे मातरम् ! वंदे मातरम् !”
        आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले.
       नॉट बॉबर उद्गारला, ” असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत !”
       पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह आल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला, असा अपप्रचार करीत, तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला. पण पंडीत मालवीय, सौ. कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळलेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. २८ फेब्रुवारीला त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून एका विराट सभेत सर्व पुढार्‍यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.
          
 
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷         
       
          ♾♾♾ ♾♾♾
         संदर्भ ~ WikipediA                                             ➖➖➖➖➖➖➖➖➖                                        

यशोगाथा थोरांची - लोकमान्य टिळक

      🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
           ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश पाटील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                             ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                           
            लोकमान्य
     बाळ गंगाधर टिळक


जन्म: २३ जुलै १८५६
(चिखली, दापोली,रत्‍नागिरी, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)

मृत्यू: १ ऑगस्ट १९२०
(पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: केसरी, मराठा
पुरस्कार: लोकमान्य, भारतीय असंतोषाचे जनक
प्रमुख स्मारके: मुंबई, दिल्ली इ.
धर्म: हिंदू
प्रभाव: शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित: महात्मा गांधी, चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर, देवेंद्र फडणविस, बाळासाहेब ठाकरे
वडील: गंगाधर रामचंद्र टिळक
आई: पार्वतीबाई टिळक
पत्नी: सत्यभामाबाई
अपत्ये: श्रीधर बळवंत टिळक
 घोषणा : "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. "
      हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

👦 बालपण
टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली हे त्यांचे मूळ गाव होय.

समवयस्क मुलांपेक्षा भिन्नता
आपल्या समवयस्क मुलांपेक्षा ते भिन्न प्रकृतीचा होते. एकदा शाळेत त्यांच्या गुरुजींनी गणित घातले. ‘पाच बकर्‍या १ कुरण २८ दिवसांत खातात, तर तेच कुरण २० दिवसांत किती बकर्‍या संपवतील ? बाळने उत्तर दिले, ‘गुरुजी, सात बकर्‍या.’ गुरुजी बाळाजवळ गेले आणि वही उचलून तीवर दृष्टी फिरवली. ‘वहीत उदाहरण उतरवून तरी घ्यायचे! कुठे सोडवले आहेस ?’ गुरुजींनी विचारले. ‘मी तोंडी करू शकतो, मग लिहिण्याची आवश्यकता काय ?’ बाळ तत्काळ म्हणाला. कितीतरी कठीण गणिते ते सहज सोडवत असत.

🏇 क्रांतीवीरांच्या कथा ऐकणे
        त्यांना कहाण्या ऐकण्याचा भारी नाद होता. अभ्यास संपला की, बाळ आजोबांकडे स्वातंत्र्ययुद्धाच्या गोष्टी ऐकण्याकरिता धाव घेई. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी या क्रांतीवीरांच्या कथा ऐकतांना तो उत्तेजित होत असे. ‘मोठा झाल्यावर मीही मातृभूमीची अशीच सेवा करीन’, हा विचार त्याच्या अंतःकरणात खोल रुजून बसला होता.

🏢 महाविद्यालयीन जीवन
         टिळकांची प्रकृती अशक्त आणि सुकुमार होती. अशाने देशाचे कार्य कसे होणार म्हणून त्यांनी प्रकृती बळकट करण्याचा निश्चय केला. महाविद्यालयाचे प्रथम वर्ष शरीर साधनेत निघून गेले. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार यांमुळे त्यांनी सर्व खेळांत प्रथम क्रमांक पटकावला. ते उत्तम मल्ल आणि पोहणारे म्हणून नावाजले. सन १८७७ मध्ये टिळक बी.ए. झाले. त्यांना गणितात प्रथम वर्ग मिळाला. पुढे त्यांनी एल्.एल्.बी.चीही पदवी संपादन केली.

🚿 प्लेगच्या फवारणीस विरोध
       लोकमान्य टिळकांच्या पत्‍नी
 सत्यभामाबाई उर्फ तापीबाई आणि मुली व नातवंडे यांच्याबरोबर प्लेगविरोधी फवारणीस विरोध.
इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली . उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात : रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.

🧭 टिळक-आगरकर मैत्री व वाद
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. राजकीय स्वातंत्र्य आधी की, समाज सुधारणा आधी या मुद्यावर त्यांच्यात मतभेद झाले. त्यातून दोघांची मैत्री तुटली. आगरकरांना केसरी सोडावे लागले.
        
दुष्काळ
इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकर्‍यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.

जहालवाद विरुद्ध मवाळवाद
तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.

🔮 लाल-बाल-पाल
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.लृ
               बंगालच्या फाळणी विरुद्धचा लढा ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
        टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.

✒ 'केसरी व मराठा ' तील अग्रलेख
टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
       सुरुवातीला आगरकरांकडे 
' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहा ब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.

📝 साहित्य आणि संशोधन
                  टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत :-
The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष 
टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.

 👪 कौटुंबिक जीवन
कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला.  त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.

💎 प्रसिद्ध घोषणा/वचने
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

📚 टिळकांवर लिहिलेली पुस्तके
टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक -व लेखक विश्राम बेडेकर
टिळक भारत - लेखक शि.ल. करंदीकर
टिळकांची पत्रे - संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
मंडालेचा राजबंदी - लेखक अरविंद व्यं. गोखले
लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६) - लेखक प्रा.वामन शिवराम आपटे
लोकमान्य टिळक दर्शन -लेखक  भालचंद्र दत्तात्रेय खेर
लोकमान्य टिळक -  लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड) - लेखक न.चिं. केळकर
लोकमान्यांची सिंहगर्जना - लेखक गिरीश दाबके
लोकमान्य ते महात्मा - लेखक सदानंद मोरे
लोकमान्य व लोकराजा लेख -  लेखक इंद्रजित नाझरे
लाल,बाल,पाल लेख - लेखक इंद्रजित नाझरे

टिळकांवर निघालेला चित्रपट
"लोकमान्य : एक युगपुरुष" (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे) - इ.स. २०१५.

🔹 सामाजिक योगदान 
इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव आणि ई.स १८९५ साली शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले. त्यांत मिरवणूक हा मोठा भाग होता.

🪔 देवाज्ञा
        टिळकांचे जीवन दिव्य होते. लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीने पात्र होते. तन, मन आणि धन सर्व अर्पण करून त्यांनी देशसेवा केली. शरीर थकलेले असतांनाही त्यांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने हा कार्यक्रम चालूच होता. जुलै १९२० मध्ये त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि १ ऑगस्टच्या प्रथम प्रहरी त्यांचा जीवनदीप मालवला. ही दुःखद वार्ता वार्‍यासारखी सर्व देशभर पसरली. आपल्या या प्रिय नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनतेचा महासागर लोटला. आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिलेल्या ध्येयवादी थोर राष्ट्रभक्ताला आमचे विनम्र अभिवादन !’

       🇮🇳 जयहिंद 🇮🇳                 
           ♾♾♾ ♾♾♾
     संदर्भ ~ WikipediA                                                                                                                                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖

मंगळवार, १८ जुलै, २०२३

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
           ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                             
   
         साहित्यरत्न लोकशाहीर  
             अण्णाभाऊ साठे

जन्म :  १ ऑगस्ट, १९२०
            (वाटेगाव, ता. वाळवा,
                           जि. सांगली) 
मृत्यू :  १८ जुलै, १९६९
             ( गोरेगाव, मुंबई )

जन्म नाव :  तुकाराम भाऊराव 
                   साठे
टोपणनाव :   अण्णाभाऊ साठे
शिक्षण : अशिक्षित
राष्ट्रीयत्व : भारतीय 
कार्यक्षेत्र : लेखक, साहित्यिक
भाषा : मराठी
साहित्य प्रकार : शाहिर, कथा,    
                       कादंबरीकार
चळवळ : संयुक्त महाराष्ट्र चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती : फकिरा
प्रभाव : बाबासाहेब आंबेडकर, 
            कार्ल मार्क्स
वडील :  भाऊराव साठे
आई : वालुबाई साठे
पत्नी : कोंडाबाई साठे,
           जयवंता साठे
अपत्ये : मधुकर, शांता आणि      
             शकुंतला

            तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,  लोककवी आणि लेखक होते. साठे एका अस्पृश्य मांग समाजामध्ये जन्मलेले एक दलित व्यक्ती होते, त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते.
       कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा; जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.
        मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच; तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर,  पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
         संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला;  त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ?  ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
           अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) हीत्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी ),डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज ), फकिरा (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.
         उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीतखूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.
          अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’, असे ते म्हणत; आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होता. मानवी जीवनातील संघर्ष, नाटय, दुःख, दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माणझाली. त्यात बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, यशवंत मनोहर, दया पवार, केशव मेश्राम, शरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो.
        अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे. नाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुण. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले.
         रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचाप्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.
          पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.

महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

       ♾♾♾  ♾♾♾
           स्त्रोत ~ wikaspedia
➖➖➖➖➖➖➖➖➖

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनूभवले चांद्रयान 3 चे लाईव्ह प्रक्षेपण...

नव्या क्षमतांसह उड्डाण घेणाऱ्या चांद्रयान-3 च्या उड्डाणाची विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली प्रत्यक्ष अनुभूती....
धुळे दि. १४/7/23


आज आपल्या देशाने  चांद्रयान 3 ची यशस्वी चाचणी केली. दुपारी ठिक 2.35 मिनीटांनी या यानाने चंद्राकडे झेप घेतली. याचे लाईव्ह प्रक्षेपण आज बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विज्ञान शिक्षक श्री एस. आर. पाटील यांनी या यानाची माहिती दिली. चंद्रावर जवळजवळ चाळीस दिवसानंतर पोहचणार्या या यानाचा प्रवास कसा असेल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. आणि शेवटी उड्डाणाची वेळ जवळ आल्यानंतर सेकंद मोजत असतानाच उड्डाण घेणाऱ्या चांद्रयान 3 ने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या चेहर्‍यावर रोमांच पसरवला. सर्व उल्हासीत होऊन जल्लोष साजरा करीत होते. विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. 
संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून कार्यक्रम यशस्वी आयोजन करण्यात आले. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...